ग्रामविकास मंत्री गोरे यांच्याकडून पालखी स्थळाची पाहणी   

वारकर्‍यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश

पुणे : ग्रामविकास व पंचायतीराज मंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील पालखीतळ आणि पालखी विसाव्याची पाहणी केली. पालखीतळ वारकर्‍यांसाठी पाणी, स्वच्छतागृहे, आरोग्य आदी सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.मंत्री गोरे यांनी नीरा विसावा तळापासून सुरुवात केेली. वाल्हे, जेजुरी, सासवड या पालखी मुक्काम तळाची आणि पिंपरी खुर्द, दौंडज, शीव, साकुर्डे, यमाई शिवरी, बोरावके मळा या पालखी विसावा तळाची पाहणी केली.
 
यावेळी प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, नीरा येथे सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुरंदरचे प्रांताधिकारी वर्षा लांडगे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, पोलिस उपअधीक्षक तानाजी बर्डे, तहसीलदार विक्रम राजपूत उपस्थित होते.
 
पाहणीनंतर गोरे म्हणाले, पालखीतळांच्या ठिकाणी प्रत्येक वर्षी त्याच-त्याच सुविधांची दुरुस्ती करत राहण्यापेक्षा कायमस्वरुपी सुविधा निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांचे आहेत. त्यानुसार काम करण्याचे नियोजन असून, प्रशासनाने प्रस्ताव द्यावेत. नीरा विसावा स्थळ येथील पालखी विसाव्याच्या ठिकाणी काँक्रीटीकरण करण्यासाठी ५० लाख देण्यात येतील, पालखीपूर्वी हे काम पूर्ण करावे, नीरा नदी स्नानासाठी घाट बांधण्याचा प्रस्ताव देण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.
 
यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. काही पुल पाडले आहेत. त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. मोठ्या प्रमाणात पावसामुळे वारकर्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रत्येक पालखी तळावर त्याप्रमाणे नियोजन करण्याच्या सूचना देऊन मंत्री गोरे म्हणाले, वाल्हे पालखीतळ येथून पालखीचे मार्गक्रमण गतीने आणि सुलभपणे व्हावे. यासाठी पालखीतळ ते सुकलवाडी, जीरपवस्ती ते गुळूंचे मार्गे नीरा हा पर्यायी रस्ता व्हावा, अशी मागणी असून, त्यानुसार जिल्हा परिषदेचे प्रस्ताव करावा. पालखी तळाच्या शेजारच्या लहान रस्त्याच्या साईड पट्ट्या भरून घ्याव्यात. पालखी तळावरील सर्व पोलला सीसीटीव्ही बसवावेत, अशा सूचना केल्या.
 
प्रत्येक पालखी तळाच्या ठिकाणी वारकर्‍यांच्या सोईसाठी ७ लाख ५० हजार चौरस फुटाचा मंडप करण्यात येणार आहे. महिलांसाठी मोठ्या प्रमाणात वेगळी स्नानगृहे उभारण्यात येणार आहे. अनेक पालखी तळावर पाणी साचते त्याबाबत मार्ग काढण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार विजय शिवतारे, आमदार राहुल कुल, माजी आमदार अशोक टेकवडे, जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, वाल्हे गावचे सरपंच अतुल गायकवाड यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles